
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
कोरेगाव मूळ(प्रतिनिधी) :
कोरेगाव मूळ पंचायत समिती गण हा परिसर ग्रामीण आणि नागरी अशा दोन वेगळ्या विभागांमध्ये विभागला गेल्यामुळे येथील नागरिकांच्या समस्या देखील वेगवेगळ्या स्वरूपाच्या बनल्या आहेत. एका बाजूला ग्रामीण भागातील शेती, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य व शिक्षणाच्या मूलभूत अडचणी आहेत, तर दुसऱ्या बाजूला नागरी भागात वाढते नागरीकरण, वाहतूक कोंडी, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि नियोजनाचा अभाव यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार कृषिराज ऊर्फ मनोज तात्या चौधरी यांनी कोरेगाव मूळ गणातील ग्रामीण व नागरी दोन्ही विभागातील प्रश्न समजून घेत विकासाचा ठोस अजेंडा मांडत निवडणूक मैदानात ठामपणे प्रवेश केला आहे.
चौधरी यांनी प्रचारादरम्यान विविध गावांना भेटी देत नागरिकांशी थेट संवाद साधला. ग्रामस्थांच्या समस्या ऐकून घेताना त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, “या गणातील विकासासाठी केवळ आश्वासन नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीची गरज आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना पाण्याची सोय, शेतीपूरक रस्ते, आरोग्य सेवा तसेच नागरी भागातील स्वच्छता, वाहतूक नियोजन, पथदिवे, ड्रेनेज आणि सार्वजनिक सुविधा या सर्व बाबींवर प्राधान्याने काम केले जाईल.”
ग्रामीण भागात शेती व रोजगाराच्या संधी वाढवण्यासाठी विशेष योजना राबवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. तसेच नागरी भागात वाढत्या लोकसंख्येमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर नियोजनबद्ध उपाययोजना करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
या प्रचार दौऱ्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळत असून, युवक वर्ग, महिला आणि ग्रामस्थांमध्ये कृषिराज चौधरी यांच्या नेतृत्वाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. “काम करणारा नेतृत्वाचा चेहरा म्हणून कृषिराज चौधरी यांच्याकडे पाहिले जात आहे,” अशी चर्चा मतदारांमध्ये सुरू आहे.










