थेऊर गावात पुरसदृष्य परिस्थिती; शेकडो कुटुंब बेघर . थेऊर वरून नायगाव ला जाणारा रस्ता पुरामुळे बंद.

Facebook
Twitter
WhatsApp
राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा
थेऊर, ता. हवेली:
   नैसर्गिक ओढे बुजवून त्यावर अनधिकृत प्लॉटिंग, शेतजमिनींचे रक्षण करण्यासाठी उभारण्यात आलेल्या विनाकारण अडथळे आणि अल्पावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे थेऊर गाव पाण्याखाली गेले आहे. न भूतो न भविष्यती अशी परिस्थिती गावात निर्माण झाली असून शेकडो कुटुंब रस्त्यावर आले आहेत.
घराघरांत पाणी शिरल्यामुळे संसार उद्ध्वस्त झाला आहे. घरातील आवश्यक वस्तू, भौतिक साधने, टू-व्हीलर गाड्या आणि पशुधन वाहून गेले आहे. महादेव बळीराम कांबळे यांच्या दोन म्हशी व एक गाई तसेच ताराचंद बोडरे यांच्या १२ शेळ्या या पुरात बुडून मृत्युमुखी पडल्या आहेत.
पुराचा जोर एवढा प्रचंड होता की काँक्रीटमध्ये उभी केलेली संरक्षण भिंतसुद्धा कोसळली. ही भिंत पडल्यामुळे काहींची घरे वाचली, अन्यथा मोठ्या प्रमाणावर जीवितहानी व संपत्तीचे नुकसान झाले असते, असे नागरिकांचे म्हणणे आहे. मात्र, हीच भिंत वादग्रस्त असून या भिंतीमुळेच पाणी अडवले गेले आणि पूरस्थिती निर्माण झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

या आपत्तीग्रस्त भागाची माननीय तहसीलदार तृप्ती कोलते यांनी पाहणी केली असून नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्याचे आणि मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान, PMRDA टिमने युद्धपातळीवर काम करून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवले.
यासोबतच, पोलीस पाटील रश्मी कांबळे, ग्रामविकास अधिकारी तुकाराम पाटील, पोलीस कर्मचारी, तलाठी सरला पाटील व मंडळाधिकारी जाधव यांनीही पूरग्रस्त ठिकाणी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी नागरिकांना आधार दिला व मदतकार्य सुरू केले.
स्थानिक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात मदतकार्य हाती घेतले असून बचावकार्य सुरू आहे. गोरगरीब नागरिकांचे संसार उद्ध्वस्त झाल्याने त्यांना योग्य तो न्याय व भरपाई मिळणार का? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
दरम्यान, या पूरग्रस्त परिस्थितीमुळे थेऊर ते नायगाव जाणारा रस्ता खचला असून वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. या रस्त्याच्या खालून ओढ्याचे पाणी जात होते, मात्र पाण्याचा प्रेशर अतोनात वाढल्यामुळे रस्ता कोसळला आणि दोन्ही गावांतील संपर्क तुटला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Tags