

राष्ट्रहित टाईम्स वृत्तसेवा प्रतिनिधी
थेऊर (ता. हवेली) – दि. १३ नोव्हेंबर २०२५
महाराष्ट्र राज्य शासनाने अहमदनगर जिल्ह्याचे नामांतर करून अधिकृतपणे आहिल्यानगरअसे नाव लागू केले असतानाही, पुणे जिल्ह्यातील महामार्ग मार्गदर्शक फलकांवर आजही अहमदनगर’ हेच नाव दिसत असल्याने छत्रपती सेवा संघ, थेऊर यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करून नाव बदलण्याचे निवेदन सार्वजनिक बांधकाम विभागाला सादर केले आहे.ही मागणी सागर प्रमोद राजगुरू, अध्यक्ष – छत्रपती सेवा संघ, थेऊर, यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे (प्रमुख अभियंता कार्यालय) यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनातील प्रमुख मुद्दे
महाराष्ट्र शासनाने नामांतरणाची अधिसूचना काढून अहमदनगरचे अहिल्यानगर असे नामांतर केलेले आहे.
राज्यातील अनेक शासकीय कार्यालये, जिल्हे, वाहतूक विभाग, रेलवे विभाग इत्यादीने हे नाव बदल अमलात आणला आहे.
तरी देखील पुणे जिल्ह्यातील काही राष्ट्रीय महामार्ग व राज्य महामार्गांवरील फलक आजही जुने ‘अहमदनगर’ नाव धारण करत आहेत.
विशेषतः पुणे–नगर महामार्गावरील थेऊर फाटा परिसरात जुन्या नावाचे फलक दिसत असून त्यामुळे मार्गक्रमण करणाऱ्या यात्रेकरू व वाहनचालकांत संभ्रम निर्माण होतो.
नामांतरणानंतरदेखील जुन्या नावाचा वापर होत असल्याने राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या विषयीचा आदर व राज्य शासनाच्या निर्णयाचा मान राखला जात नाही, अशी भूमिका संघाने मांडली आहे.
🔹 संघाची मागणी स्पष्ट
छत्रपती सेवा संघाने मागणी केली आहे की—
“महामार्गावरील सर्व मार्गदर्शक फलकांवरील ‘अहमदनगर’ हे नाव तात्काळ काढून टाकून ‘आहिल्यानगर असे योग्य प्रकारे दुरुस्ती करून लावण्यात यावे.”
🔹 मुख्य अधिकाऱ्यांची नोंद
निवेदन प्रत्यक्ष स्वीकारून प्रभागीय मुख्य कार्यकारी अधिकारी आवक लिपिक, सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे, यांनी याची नोंद केली असून आवश्यक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिल्याचीमाहिती मिळते.









